: महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाद्वारे समाजसुधारणेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, समाजाला दिशा दाखवली. महिलांच्या शैक्षणिक क्रांतीचे आणि शिवजयंतीचे ते खरे जनक होते. त्यांच्या विचारानेच समाजाने शैक्षणिक व आर्थिक प्रगती केली आहे. त्यांचे विचार व कार्य समाजाला आजही प्रेरणादायी असून त्यांच्या कार्यास वंदन करण्यासाठी, केंद्र सरकारने फुले दाम्पत्याला मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या सदस्या व बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी येथे केले.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात बागलाण तालुका महाविकास आघाडीतर्फे आयोजित कार्यक्रमात सौ.चव्हाण बोलत होत्या. माजी आमदार सौ.चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, शहरप्रमुख रविंद्र सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शहराध्यक्ष साहेबराव गब्बर सोनवणे, कार्याध्यक्ष मनोज छोटु सोनवणे, महिला तालुकाध्यक्ष उषाताई भामरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, अरविंद सोनवणे, मुन्ना सोनवणे, सुमित वाघ, समता परिषदेचे शहराध्यक्ष यशवंत कात्रे, सुरेखा बच्छाव, शरद शेवाळे, संजय पवार आदींच्या हस्ते महात्मा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
जयंती निमित्त पुतळा परिसराची आज आकर्षक विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती. आकर्षक विद्युत रोषणाईने पुतळा परिसर उजळून निघाला होता. मध्यरात्री ठीक बारा वाजता जयंती उत्सवानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी जिभाऊ सोनवणे, पोपटराव सोनवणे, राजनसिंह चौधरी, अॅड.सोमदत्त मुंजवाडकर, सुनील खैरनार, दादाजी खैरनार, संदीप भामरे, अपर्णा येवलकर, शमा दंडगव्हाळ, वंदना भामरे आदींसह कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.